संगमेश्वर : प्लास्टिक न वापरण्याबद्दल किंवा त्याच्या पुनर्वापराबद्दल अनेकदा चर्चा होत असलेली आपण ऐकतो; पण त्याबाबत प्रत्यक्ष कृती करणारे हात मात्र अत्यंत कमी असतात. कोळंबे (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) या गावातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एकने मात्र या बाबतीत आदर्श घालून दिला आहे. गावातील टाकाऊ प्लास्टिक गोळा करून, त्यापासून टिकाऊ, शोभिवंत वस्तू तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामस्वच्छता आणि प्लास्टिक पुनर्वापर अशा दोन गोष्टी साध्य झाल्या आहेत. शिवाय मुलांना चांगला संदेशही मिळाला आहे.
शाळेतील उपक्रमशील शिक्षक पंडितराव ढवळे यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘स्वच्छ भारत’ योजनेतून प्रेरणा घेऊन कोळंबे शाळेत ‘बलशाली भारत आदर्श भारत’ या नावाची विद्यार्थी संघटना तयार करण्यात आली. गावात पडलेला टाकाऊ प्लास्टिक कचरा वेचण्याची कामगिरी विद्यार्थ्यांनी सुरू केली. शाळेत आणलेल्या टाकाऊ प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून आजपर्यंत १००हून अधिक टिकाऊ वस्तू तयार करण्यात आल्या आहेत. त्यात पक्षी थांबा, स्टँड, छत्री स्टँड, पेन स्टँड, फुले, फुलदाणी, बशी स्टँड, बुक स्टँड, तोरणे, प्लास्टिक बाटल्यांपासून माइक, टोप, टाकाऊ कपांपासून झुंबर अशा शोभेच्या अनेक वस्तूंचा समावेश आहे.
हा उपक्रम गेला महिनाभर सुरू असून, शाळेतील प्रत्येक मुलाच्या वाडीतून स्वच्छता होत आहे. या उपक्रमामुळे गेल्या पंधरा दिवसात शाळेशी जोडलेले सर्व रस्ते पूर्णपणे स्वच्छ व सुंदर झाले आहेत. विद्यार्थ्यांची ही संघटना गावात कापडी पिशव्यांबाबत जनजागृतीही करत आहे.
शाळेने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. व्यवस्थापन कमिटी अध्यक्षा रसिका पंडित आणि सुप्रिया ढवळे यांनीही उपक्रमत सहभागी होऊन मुलांना प्रोत्साहन दिले आहे. या उपक्रमाला पालकांचीही साथ मिळत आहे.
‘लहान वयातच विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी आम्ही हा प्रयोग सुरू केला. त्यात यश येत असून, हा उपक्रम पुढेही सुरू ठेवणार आहोत,’ असे पंडितराव ढवळे यांनी सांगितले.